शनिवार, २८ जून, २०१४

समर्थांचे शिवरायांना पत्र


समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना पाठविलेले हे पत्र अतिशय प्रसिद्ध आहे... यशवंतराव चव्हाण म्हणत की या पत्रासारखे शिवरायांचे समर्पक वर्णन करणे आजवर
कुणाला जमलेले नाही!!!

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ॥
अशी या पत्राची सुरुवात होते...

या पत्रातून शिवराय व समर्थ यांच्या मधील संबंधांचे अनेक पैलू उघड होत जातात. या पत्रातील ओळ अन ओळ, शब्द अन शब्द महत्वाचा व लाख मोलाचा आहे...
श्री समर्थांनी यात शिवरायांना उद्देशून वापरलेला प्रत्येक शब्द अतिशय जपून, पारखून, परीक्षून, स्वत: अनुभव घेऊन मगच वापरलेला आहे!!!
या पत्रातूनच दोघांमधील संबंध अत्यंत जवळचे व तरीही अत्यंत आदराचे कसे होते तेही स्पष्ट होते!!!
याच पत्रात समर्थांनी शिवरायांना दिलेली "श्रीमंतयोगी",
"जाणता राजा","शिवकल्याणराजा" यासारखी विशेषणे आज अजरामर झालेली आहेत!!!

पत्राचे प्रामुख्याने ३ भाग पडतात, पहिला भाग बराच मोठा असून यात शिवरायांचे कौतुक, वर्णन, त्यांच्या कार्याचा गौरव आलेला आहे!!!
संपूर्ण भारतभर मठांचा पसारा व भ्रमण असणारे समर्थ पत्राच्या शेवटून तिस-या ओवीत म्हणतात की तुमच्याच राज्यात सध्या फ़िरत फ़िरत आलो होतो परंतु आपण जवळपासच आलेले आहात, हे तुम्ही सध्या कुठे आहात त्याची मी चौकशी न कळल्याने माहिती नाही झाले...

यावरून हे दिसते की समर्थ महाराष्ट्रात आल्या आल्या दर वेळेस आधी शिवरायांचे वर्तमान घेत असत! मग अन्य
कामे करीत असत! याच ऋणानुबंधाचा उल्लेखही ते पत्रात करतात व त्याचमुळे या खेपेस माहिती घेणे जमले
नाही अशी प्रांजळ कबुलीही ते या दुस-या भागात
देतात. यावरून दोघांचे संबंध किती प्रेमपूर्ण होते हे
कळते पहा! शिवराय पुढच्या भेटीत नक्की हा विषय काढतील की यंदा इथे येऊनही आमची भेट नाही घेतलीत, या प्रेमळ आग्रहापोटी समर्थ त्यांची समजूत काढताना दिसत आहेत!!!

इतके सर्व कौतुक करून झाल्यावर मात्र समर्थ मूळ विषयाला शेवटी तिस-या भागात हात घालतातच! ते म्हणतात तुम्ही तर जाणताच की उभ्या भारतात अनेक
धर्ममूर्ती म्हणता येतील अशा व्यक्ती असून तुम्ही धर्मसंस्थापक म्हणून अशा सर्व लोकांचे राजे म्हणून विराजमान आहात व धर्मसंस्थापक अशीच तुमची किर्ती आहे!
परंतु ही किर्ती आपण सांभाळलीच पाहिजे! तिला तडा देता कामा नये! अशा पद्धतीने अत्यंत कठोर शब्दात एका चक्रवर्ती सम्राट छत्रपतीला धर्मरक्षणासाठी जणु तंबी दिल्यावर समर्थ पुन्हा मवाळ होतात व जो मोठ्या लोकांमध्ये पाळला जणारा शिष्टाचार आहे त्याला अनुसरून इतके कठोर बोलण्याचे कारण काय तेही विषद करतात, ते कारण म्हणजे त्या काळात भारतभर पसरलेले विकृत राजकारण होय जे हिंदू धर्माच्या मुळावर उठलेले होते, ते पाहून समर्थांचे चित्त उद्विग्न झाले होते हे ही ते मान्य करतात व त्यापोटीच हा कठोर सल्ला, जाणीव आपणास करून दिली असे सांगत त्याबद्दल उदार अंत:करणाने त्यांची क्षमाही मागतात! कारण शिवराय
अगोदरच ते कार्य करीत आहेत अशा मनुष्यास पुन्हा जाणीव करून देणे तसे योग्य नाही हे समर्थ जाणताहेत परंतु विषयाचे गांभिर्यच तसे असल्याने ते करावे लागत आहे याचे शल्यही ते प्रांजळपणॆ कबूल करून टाकतात!!!

उदंड राजकारण तटले । तेणॆ चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥

असे हे पत्र सर्वांनी पाठ करावे, मुखोद्गत करावे असेच आहे!
या पत्राबद्दल काही मुघलजनसहकारी बीग्रेडी असा आक्षेप घेतात की या पत्रात रामदास शिवरायांची माफ़ी मागत आहेत...
त्यांना आता काय उत्तर द्यायचे हे तुम्हीच पत्र पूर्ण वाचून ठरवावे...

www.dasbodh.com

वि.दा. सावरकर... हिन्दुस्थानाच्या मातीमधे जन्मलेला लोहपुरुष..



ते म्हणाले, हिन्दुस्थानास मातृभू नि पितृभू मानणारे सर्वच जण हिन्दू आहेत(१),
नि आम्ही त्यांना इतर धर्मीयांचा तिरस्कार करणारा आंधळा धार्मिक समजलो.

ते म्हणाले, हिन्दूसस्थानात जातीच काय, पण धर्मांचेही संमिश्रण झाले आहे, त्यामुळे मीणसामाणसामधे भेद पाळणे चुकीचेच आहे(२).
राम मंदीर (पतितपावन मंदिर, रत्नागिरी)उभारुन तथाकथित अस्पृश्याला त्यांनी समाजविरोधात मंदीराचा भट बनवले. नि आम्ही त्यांना ब्राह्मणांचा नेता बनवले!

ते म्हणाले, भारतीय तरूणां-"तरुणीं"नो, NCC मधे जा, सैनिकी प्रशिक्षण घ्या, संशोधन क्षेत्रात आघाडी मारा (३),
आम्ही त्यांना, जुन्या विचारांचा नेता म्हणून अडगळीत टाकले!

ते म्हणाले, भारतीय भाषा परकीय हेतुपुरस्सर केल्या जाणार्या सांस्कृतिक आक्रमणापासून जपून ठेवा. मला मराठी येते, मराठीचे काम मी करतो. हिन्दीला पर्शियन नि अरबीपासून जपून ठेवा.(४)
आम्ही त्यांची कडवा मराठी नेता म्हणून वसलात लावली!

ते म्हणाले, गायीला उपयुक्त पशू माना. देश-धर्म संरक्षणासाठी वेळ पडली तर पळी-पंचपत्री वितळवून हत्यारे बनवा.(५)
आम्ही त्यांच्याच नावाने गोशाळांचा प्रचार करतो!

आक्रंदून ते म्हणाले, हे मातृभूमी...
तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण..
आम्ही त्यांना स्वतंत्र भारतात, जमेल तितक्यावेळा "देशविघातक" कृत्यांच्या "संशयापायी" तुरूंगात ठेवले!

गोळीची पर्वा न करता त्यांनी जहाजातून उडी मारली नि आंतरराष्ट्रीत न्यायालयात भारताची स्थिती नेउन ठेवली,
नि आम्ही या कृत्याला "छलांगभर पोहणे" म्हणून हिणवले!

तात्याराव, कित्येक दशकांपुर्वी जगलात, आजही तुम्ही आमच्या पचनी पडत नाही! तात्याराव, नियतीला शह देत आयुष्य जगलात तुम्ही, पण नियतीने खुपच मोठी खेळी केली. आमच्या सारख्या भोंदू नि स्वार्थी नि मंद माणसांमधे तुम्हाला पाठवलं! आंधळ्यांनी हत्तीला चपापायचं तसं तुमचं आयुष्य आम्ही चपापतो नि मला सावरकर कळले म्हणून ओरडत सुटतो. अप्पलपोटी राजकारणापायी नि आंधळ्या धर्माभिमानापायी कधी विरोधक म्हणून तर कधी अनुयायी म्हणून आम्हीच तुम्हाला तोंडघशी पाडतो. तात्याराव सरस्वतीनं तुमचा आदर केला- प्रचंड विद्वत्ता दिली, ब्रह्मदेव नि सटवाई तुमच्या साहसाला नमून तुमची आयुष्यरेखा झक मारत वाढचत राहीले, गणेशानं हाती घेतलेल्या कामात यश दिलं... पण आम्ही मर्त्य भूमीवरील माकडाची उत्क्रांत रुपे, तुमच्या सारख्या रत्नाची किंमत आधी हुंगून, मग निरखून पाहून नि मग दगडावर आपटून पाहत करत बसलो!!

सावरकरांची बुद्धीनिष्ठा, विद्वत्ता, प्रगाढ अभ्यास, निस्वार्थीपणा, त्याग, शौर्य, धीर, द्रष्टेपणा हे सारं सारं समजते तर नवनिर्माण दूर नाही. आणि आमचे हे सर्व तुम्हाला हरवण्याचे चाळे पाहूनही जेव्हा तुम्ही म्हणता,

अनादी मी अनंत मी अवध्य मी भला ।
मारिल रिपु जगति असा कवण जन्माला ।।

तेव्हा वाटते तुम्ही समजो वा न समजो, पण इतके नक्की की भारतमातेला सार्थ अभिमान वाटावे असा तिचा एक सुपुत्र तुम्ही आहातच!!

संदर्भ:
१. हिन्दुत्व
२. हिन्दुत्व
३. मृत्युंजय दिनानिमीत्तचे पुण्यातील भाषण
४. भाषासुधारणेवरील निबंध
५. विज्ञानिष्ठनिबंध

-रोहित होळकर

मदारी मेहतर – सत्य की मिथ्या???

मदारी मेहतर असे नाव घेऊनही त्यास सत्य की मिथ्या? असे संबोधले आहे, वाचकांना थोड़े अजब वाटेल खरे पण याच अनामिक – मदारी मेहतर या व्यक्तिमत्वाचे इतिहासातील स्थान किती खरे आहे हे तपासून पाहणे गरजेचे आहे.
अश्या नावाच्या व्यक्तीचा शिवाजी महाराजांशी आग्रा भेटीच्या वेळी खरच काही संबध आला का? सद्य स्थितीत रायगडावर असणारे ठिकाण ज्याला मशीद मोर्चा किंवा मदारी मेहतर मोर्चा असे सांगितले जाते त्यात किती सत्य आहे?
वाद विवादासाठी आपण खरे मानले तर मदारी मेहतर
ही व्यक्ति स्वराज्यात कधी आली? त्याचा संबध शिवाजी महाराजांशी परत कधी आला (खरच आला का?) या सर्वांचा मागोवा आपण आता घेऊयात.

दि. ५ मार्च १६६६ रोजी पुरंदरच्या ठरल्या तहानुसार शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबास भेटावयास गेले. या संपूर्ण आग्रा प्रकरणाचा आढावा आपण सविस्तर प्रकरणामधे घेतलेलाच आहे. शिवाजी महाराजांसोबत आग्रा येथे असणाऱ्या काही साथीदारांची नावे आपल्याला मिळतात पण प्रकर्षाने मराठी, राजस्थानी, मुघल सहित्यामध्ये मदारी मेहतर हे नाव आढळत नाही. याचा खल करताना याची सुरवात नक्की कधी झाली हे पहावे लागेल.
ऐतिहासिक अस्सल संदर्भांची छाननी केली असता मदारी असे नाव असणारा एक व्यक्ति होता ही माहितीच मुळात मिळत नाही. या संबधीचा पहीला उल्लेख आपणास मिळतो तो भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे प्रकाशित केले जाणारे त्रैमासीक वर्ष १९१७ यात एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखामधे एक पत्र आणि एक हकीक़त दिली आहे. सदर हकीकत सातारा येथील राजोपाध्ये घराण्यातील कागदपत्रात मिळाली आहे. पण ही हकीकत
कुणी आणि कधी लिहिली आहे याबद्दल माहिती मिळत नाही.
सदर हकिकतीचा अभ्यास केल्यानंतर काय माहिती मिळते ती पाहुया.
१) शिवाजी महाराजांवर मिर्ज़ा जयसिंग राजे व दिलेरखान चालून आले.
२) त्याच्या (मिर्ज़ा जयसिंग) सांगण्यावरून महाराज दिल्लीस गेले.
३) पातशाहची भेट घेऊन त्याने महाराजांना अटकेत ठेवले.
४) महाराजांनी हीरोजीला विचारले – ‘ये समई संकट पडले तर माजे जीवाचे सारथी कोन कोन आहेत ?’
हे उल्लेख वाचल्यानंतर शंकेला पहिली जागा इथेच निर्मांण होते कारण ५ मार्च १६६६ रोजी शिवाजी महाराज राजगडावरून निघाले आणि आग्र्यास ११ मे १६६६ रोजी पोहचले. भेटीच्या प्रसंगानंतर महाराजांना कैद झाली. ३ महिन्याच्या कालानंतर १७ ऑगस्ट १६६६
रोजी महाराज आग्र्याहून निसटले. या सर्व ३ महिन्याच्या कालावधीमध्ये कैदेत असताना महाराजांनी आपल्या सोबत असणारे सर्व सरदार (ठराविक सोडून) पुन्हा स्वराज्यात पाठवले, हे इतर पुराव्यानिशी आपल्याला समजते. जर असे पाऊल शिवाजी महाराजांनी उचलले असेल तर त्यांनी हीरोजी फर्जंद यास विचारलेला प्रश्न – माझे सारथ्य कोण करील? हा प्रश्नच गैरलागु होत नाही का ?
महाराजांच्या वरील मुद्द्यास उत्तर देताना हीरोजी म्हणतो ‘साहेब जे समयी आदन्या करेल ते समयीं हीरोजी फर्जंद व मेदारी मेहतर फरास हजर होउं’
यानंतर हकिकतीत येणारा जो उल्लेख आहे तिथे
दूसरी शंका उपस्थित होते. तो उल्लेख काय आहे ते
आपण पाहुया.
“…हीरोजी महाराजांच्या जागी निजला होता. बाहेरील
दरोग्याने आत विचारले (मदारिस) महाराज काय करितात यावर त्याला मदारिने उत्तर दिले राजियाचे जीवास समाधान वाटत नाही. थोड्या वेळाने दरोगा मंडळी आत आली, त्यांनी हीरोजीच्या तोंडावर असलेला पदर काढला तो महाराज नव्हे हीरोजी निघाला. मग त्यास आणि मदारिस पकडून औरंगजेबासमोर नेले. मग औरंगजेबाने हीरोजीस विचारले महाराज़ कुठे आहेत? हीरोजीने ते आपल्या देशी गेल्याचे सांगितले. यावर औरंगजेबाने हीरोजीची गर्दन मारण्याचा हुकुम
केला (शिक्षा फ़क्त हीरोजीस मदारिस काहीच नाही?) यावर हीरोजी औरंगजेबास म्हणाला सुखरूप शिरच्छेद करावा हा जीव महाराजांवर ओवाळून टाकला आहे. याहून हास्यास्पद उल्लेख तर पुढें आहे – औरंगजेब हीरोजीस म्हणाला ‘तु इमानी चाकर आहेस मी मेहरबान झालो आहे माग तूला काय मागायचे?’
यावर हीरोजी औरंगजेबास म्हणतो – ‘मदारिस आणि मला सोडून द्यावे’, आणि औरंगजेबाने दोघांना सोडून दिले (कोण विश्वास ठेवेल ह्यावर?) सर्वात महत्वाचे म्हणजे हीरोजी पकडले गेले ही नवीनच माहीती अभ्यासकांना मिळते ह्या दिव्य साधनातून!!!
इतिहास साक्षीदार आहे शिवाजी महाराजांनी ज़ी फजिती औरंगजेबाची केली त्याची सल त्याच्या मनात कायमची राहिली. महाराज निसटले ही बातमी समजताच फौलादख़ान याने शोध मोहीम सुरु केलीँ. यात पकडले गेलेले रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर, कविंद्र परमानंद यांचे उल्लेख
आपल्यालाला अस्सल साधनांमधे मिळतात, पण हीरोजी पकडले गेले असा उल्लेख कुठेच मिळत नाही. त्यामुळे हि हकीकत किती विश्वासहार्य आहे हे वाचकानींच ठरवावे.
याच हकीकतिची विश्वासहर्ता अजुन डळमळीत होते
ती पुढील उल्लेखावरून -
“…दोघेजण (हीरोजी आणि मदारी) काही दिवसांनी रायगडास आले. (रायगड ?? महाराज राजगडास परत आले याची नोंद जेधे शकावली मध्ये आहे) यानंतर या हकीकतीमध्ये हीरोजीला रायगडाची किल्लेदारी दिल्याचा उल्लेख आहे (हे कसे काय शक्य आहे?? स्वत: शिवाजी महाराजांचे वास्तव्य रायगडास १६७२ पासून होते तर
हीरोजीला किल्लेदारी देण्याचा प्रश्नच येतो कुठे??) नंतर मदारीस पण पोषाख वस्त्रे आणि हक्क वंश परंपरा करून दिला (म्हणजे काय दिले? वतन दिले? जमीन दिली?) पण कुठे? याची काही माहिती मिळत नाही. याउपर
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांसोबत
मदारीचा मुलगा सादुल्ला होता असे म्हटले आहे (मग
मदारीचा मृत्यु कसा झाला? कुठे झाला? तो आग्र्यावरून त्याच्या कुटुंबासोबत महाराष्ट्रात आला होता का? त्याचा मुलगा सादुल्ला खरोखर होता तर आज पर्यँत संभाजी महाराजांवर लिहिलेल्या चरित्रामधे या सादुल्लाचा साधा नाममात्र उल्लेख देखील नाही. याला काय म्हणावे?)
वरील सर्व उल्लेखामधील माहितीचा घटनाक्रम पाहता कित्येक मुद्दे हे विश्वासनीय नाहीत. कुठलाच संदर्भ जुळत नाही, यावरून ही हकीकत कशी विश्वासनीय मानावी हा एक मोठा गहन प्रश्न आहे.

कल्याणदास आणि परकालदास यांचा पत्रसारसंग्रह हा अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. (Shivaji Visit To Aurangjib At Agra) असे या पुस्तकाचे नाव आहे. या अस्सल संदर्भात देखील मदारी मेहतर असे नाव मिळत नाही. या संबधीचा अभ्यास करत असताना काही शिवचरित्रामध्ये (कादंबरी नव्हे) कल्याणदास आणि परकालदास यांच्या पत्रांचा संदर्भ आहे असे निदर्शनास आले. संबधित पत्र तपासले असता त्यामधे देखील मदारी मेहतर हे नाव मिळाले नाही. संबधित पत्राचा संदर्भ – Shivaji Visit To Aurangjib At Agra – Letter no – 33 असा दिलेला आहे.
वरील सर्व मुद्दे हे उपलब्ध पुराव्यांवर झालें.
आता वर्षानुवषॅ चालत आलेली दंतकथा पाहुयात- यामधे अग्रक्रमांक लागतो तो म्हणजे सद्यस्थितीमध्ये रायगड किल्ल्यावर महाद्वाराजवळ एक ठिकाण दाखवले जाते त्यास मशिद मोर्चा किंवा मदारी मेहतर मोर्चा असे म्हटले जाते त्याचा. मुळत:च हे ठिकाण कधी निर्माण झालें
याबद्दल आजपर्यंत कोणीही काहीही सांगितलेले नाही.
शिवाजी महाराजांना धर्म निरपेक्ष (Secular) दाखवताना काही मंडळी सूचकपणे मदारी मेहतरच्या स्मरणार्थ मशिद मोर्चा बांधला असे सांगतात. हा मुद्दा जरी तात्विक दृष्टया मान्य केला तर मग वरती म्हटल्या प्रमाणे मदारीचा मृत्यू कधी झाला? आणि महाराजांनी त्याच्या स्मरणार्थ बांधला असेल तर मग मदारीचा मृत्यु हा १६८० च्या अगोदर ( महाराजांच्या निधनाआधी) झाला का? याचे उत्तर कोण देणार?
स्वराज्याचे बांधकाम व्यवस्थापक हीरोजी इंदुलकर
यांना शिवाजी महाराजांनी हे बांधकाम करण्याचे आदेश
दिले होते का? राज्याभिषेकवेळी असणारे रायगडाचे वर्णन उपलब्ध आहे त्यात पण असे काही ठिकाण होते असा उल्लेख मिळत नाही.
शिवचरित्राच्या सर्वात जवळचा असणारा संदर्भ म्हणजे ‘सभासद बखर‘ यामधे आलेला उल्लेख पाहुया -
‘आपला साज सर्व उतरून हीरोजी फरजंद यास घालून
आपले पलंगावरी निजवले, हात मात्र उघडा बाहेर दिसू
दीला आणि शेला पांघरला व एक पोरगा रगङावयास
ठेवला.’ - इथे उल्लेख एक पोरगा असा केला आहे.
कृष्णाजी अनंत सभासद हे स्वतः राजीभिषेकावेळी हजर होते. जर असे मशीद/मदारी मेहतर मोर्चा नामक कपोलकल्पित ठिकाण तेथे असेल, तर त्यांनी त्याचा उल्लेख नक्की केला नसता?
मदारी मेहतर या नावाचा कुठलाही अस्सल पुरावा हा मराठी साधनांत तर सोडाच पण मुघल – राजस्थानी साधनांमधे देखील मिळत नाही.याची दूसरी बाजु जर आपण पाहिली तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८९ ते १७३३ या काळा पर्यंत रायगडावर यावनी राज्य होते.
या काळामधे अशी काही ठिकाण रायगडावर अस्तित्वात आली का यांचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरेल.
सारांश मदारी मेहतर असे नाव असणारा एक इसम होता हे दाखवणारे एकही समकालीन साधन उपलब्ध नाही . एकंदरच मदारी मेहतर हे प्रकरण इतिहासात दंतकथा कश्या निर्माण केल्या जातात ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे!!!
|| लेखन सीमा ||

विशाल खुळे – marathahistory.com |
Email : padmadurg@gmail.com

www.dasbodh.com

टीप- प्रस्तुत लेखात तत्कालिन ऐतिहासिक साधनांचा उल्लेख आणि संदर्भ दिलेला आहे. त्यामुळे तथाकथित "खर्या इतिहासकारांनी" तोंड उघडण्याआधी गृहपाठ करावा... अपमान झाल्यास संचालक जबाबदार नाहीत.