बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी जेम्स लेन च्या पुस्तक संधार्बत लिहलेले

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नवहे तर सार्‍या भारताचे आराध्य प्रेरणा स्थान आहे. म्हणूनच भारतीयांच्या अशा प्रेरणास्थानांची हीन आणि निराधार चिकीत्सा करण्याची खोड पाश्‍चात्यांमध्ये दिसून येते. ती परंपराच झाली आहे. ती मोडून काढण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरून प्रयत्न व्हायला हवेत. महाराष्ट्राच्या इतिहासाचे विशेषत: आद्य छत्रपति स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराच यांच्या जीवनाचे अत्यंत अभ्यासपूर्वक दर्शन जनतेपुढे यावे अशी अतिशय दुरर्दशी इच्छा भूतपूर्व महाराष्ट्र - मुख्यमंत्री , भारताचे माजी संरक्षणमंत्री, माजी परराष्ट्र मंत्री आणि माजी उपपंतप्रधान माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या मनात तळमळीने होती. मुख्यमंत्री असताना त्यंनी याबाबतीत प्रत्यक्ष योजनाही केली. परंतु ती साकार झालीच नाही. हे राष्ट्रीय महत्वाचे कार्य न होताच माननीय यशवंतरावजी चव्हाण स्वर्गवासी झाले. हे जर कार्य पूणे झाले असते तर त्याची जगातील एकूण एक प्रमुख भाषात भाषांतरे होऊन एक फार मोठे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे काम झाले असते. शिवचरित्राचे मोल मानवी जीवनात किती मोठे आहे व महत्वाचे आहे हे विवेचन करून सांगण्याची आवश्यकता नाही. शिवचरित्र साधार व चिकीत्सापूर्वक ज्ञात्यांकडून लिहून घेऊन प्रसिध्द करणे हा खरोखर एक राष्ट्रीय महत्वाचा प्रकल्प आहे. हा महान प्रकल्प महाराष्ट्र राज्याने अजूनही लवकरात लवकर हाती घ्यावा आणि खंडश: हा प्रचंड प्रकल्प पूर्ण करावा. अशी माझी महाराष्ट्र राज्यास आग्रहाची विनवणी आहे.

जेम्स लेन या अमेरिकन लेखकाचे छत्रपती महारांजाविषयीचे ( मुळातच चुकीच्या शीर्षकाचे ) एक पुस्तक हे ऑक्सफर्ड
युनिर्व्हसिटी प्रेस इंडिया यांनी सप्टेंबर -ऑक्टोबर २००३ या कालखंडात नवी दिल्ली येथे असलेल्या आपल्या कार्यालयाच्या पत्यावर प्रसिध्द केले. युनिर्व्हसिटीप्रेसचे मॅनेजिंग डायरेक्टर या नात्यांनी श्री. मनझर खान यांनी प्रसिध्द केले.

महाराष्ट्रातील ज्या काही इतिहास संशोधकांना ते समजले व उपलब्ध झाले त्यांनी ते वाचून तातडीने लेन यांच्या अत्यंत आक्षेपार्ह व निराधार अशा लेखनाचा निषेध केला. कोल्हापूरचे इतिहास पंडित प्रा.डॉ. जयसिंगराव पवार, प्रा.डॉ.वसंतराव के मोरे, लाकेसभेतील पुण्याचे मा.प्रतिनीधी श्री.प्रदीपराव रावत, श्री. गजाननराव मेहंदळे, श्री.निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिवराव शिवदे आणि मी स्वत: ( ब.मो. पुरंदरे) यांनी या पुस्तकाच्या लेखकाचा निषेध करणारे आणि या पुस्तकाचे वितरण तातडीने थांबविण्याची मागणी करणारे एक पत्र सामुहिकपणे दिनांक १० नोव्हेंबर २००३ रोजीच ऑक्सफर्ड प्रेसचे पुमुख श्री. मनझर खान यांचेकडे पाठविले. ङी. मनझर खान यांचे आंम्हास दिनांक २१ नोव्हेंबर २००३ रोजीचे प्रत्येकाचे नावाचे पण एकाच मजकूराचे उत्तर लगेच मिळाले. त्यात त्यांनी आपल्या पत्रात जेम्स लेन यांच्या आक्षेपार्ह, निराधार आणि भावना दुखावणार्‍या मजकुराबद्दल मनापासून खेद व्यक्त करुन सदरहू पुस्तकाचे अगदी त्वरीत प्रसारण थांबवीत असल्याचे आंम्हास लिहीले आहे.

आंम्ही युनिर्व्हसिटी प्रेस व श्री. मनझर खान यांना लिहीलेल्या
( 10-11-2003 ) आणि त्यांच्या आम्हांस आलेल्या अधिकृत पत्राच्या
( 21-11-2003 ) झेरॉक्स प्रती सोबत जोडीत आहोत.

या अशा तर्‍हेच्या भयानक निराधार म्हणूनच साफ चुकीच्या मजकुरांना वा ग्रंथाना त्वरीत उत्तर देणे अपरिहार्य असले तरी अखेर कायम स्वरूपात इतिहासाचे सत्य स्वरुप जगाला कळावे म्हणून कै. मा.यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेप्रमाणे शिवचरित्राचे, महाप्रकल्प मानून, सविस्तर शास्त्रशुध्द लेखन होणे अत्यंत आवश्यक आहे.

या युरोपियन / पाश्‍चात्य लोकांच्या नितिमत्तेच्या कल्पना अत्यंत ढिसाळ असतात. आई - वडिल, बहिण भाऊ, पती - पत्नी या नात्यांपेक्षाही सगळीच नाती ते नर - मादीच्या स्वरुपात पाहतात. त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. लेडी डायना एवढे एकच उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे मग अशी अनंत उदाहरणे ! त्यातूनच भारतामध्ये ही विचारसरणी हळूहळू डोकावत आहे.

याच मापात हे पाश्‍चात्य लेखक भारतातील पौराणीक महान स्त्री - पुरुषांना
आणि ऐतिहासिक कालीन छत्रपती शिवाजी महाराज, झाशीच्या लक्ष्मीबाई, नाना फडणवीस, वीर सावरकर आणि अशा अनेकां विषयी भारतीय मनाला कधीही न पटणारे असे निराधार विचार केवळ कल्पनेतून काढतात आणि लिहीत सुटतात. ते शास्त्रीय इतिहास साधनांचाही विचार करीत नाहीत आणि येथील जनमनांचा विचार मुळीच करीत नाही. पाश्‍चात्य आणि भारतीय संस्कृतीतील नितिमत्तेच्या कल्पनांत जमीन - आस्मानांचे अंतर आहे. पाश्‍चात्य लेखकांनी अशा तर्‍हेच्या केलेल्या असंख्य लेखांच्या संकलनाचा एखादा मोठा खंडप्राय ग्रंथ होऊ शकले.

आता आन भारतीयांनीच या अशा प्रकारच्या पाश्‍चात्य आक्षेपावंर कसा दृष्टीक्षेप टाकावयाचा आणि कृती करावयाची याचा विवेकाने अचूक विचार करावयास हवा.

एकतर निश्‍चित की पाश्‍चात्यांनी भारतीयांचे एक नाजूक वर्म अचूक हेरले होते आणि आहे, अन् ते म्हणजे नैतिक अब्रु आणि चारित्र्य या वर्मावरच घाव घातला की भारतीय मन स्वत:च संभ्रमीत होते. आणि ते स्वत:च्याच अस्मितांवर संशय घेऊन स्वत:च घाव घालावयास उठते. मग कुणी कादंबरी लिहीतो, नाटक लिहीतो वा ग्रंथ लिहीतो. आपल्याच सतिहासाचे निराधार विडंबन करण्यासही तो मागे पुढे पाहत नाही. अन् इथेच अशा विकृत पाश्‍चात्य लेखनाचा विजय होतो. अस्वस्थ होऊन शास्त्रीय अभ्यास करणारा वा रागावणारा आमच्यात कुणी तुरळकच असतो.

आजही जेम्स लेन या लेखकाने असाच निराधार आघात आमच्यावर केला आहे. त्याने हा घाव कमरे खाली घातला आहे. या आघाताला आम्ही आपसातच एकमेकावर घाव घालून लेनला विजयी करायचे का ? आपणच विचार केला पाहिजे. लेनच्या निराधार लेखनाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. माझे मत तर असे आहे की, आमच्या केंद्रिय राष्ट्रीय सत्तेने
राष्ट्रीय पातळीवर याचा जाब विचारावा. जेम्स लेन चे पुस्तकातील संबंधित लेखन व त्यानंतर त्यांनी केलेला खुलासा शास्त्रीय इतिहासकारास अजिबात शोभणारा व पटणारा नाही. रस्त्यावरील कोणा अपरिचीत माणसाने गर्दीत गप्पा मारताना हा ‘ज्योक’ केला म्हणे ! लेनने तो ऐकला म्हणे ! अन् तो आपल्या इतिहास ग्रंथात ( ? ) दाखल केला. हा शास्त्रीय इतिहास ग्रंथ ठरतो काय ? हे जबाबदारीचे लेखन काय? पण असले लेखन गेली काही शतके करून, पाश्‍चात्यांनी आमच्यात फूट पाडून आमच्यावरच विजय मिळविले आहेत. असली मिसाईलस् त्यांच्या पाशी तयार आहेत व तयार होत असतात . गर्दीतही असे पोरकट व बेजबाबदार ज्योक करणारे कुणी असतील तर ते ही राष्ट्रीय व सामाजिक गुन्हेगारच आहेत.

लेनच्या पातकी विधानांचा पहिला निषेध दिनांक १० नोव्हेंबर २००३ रोजी आंम्ही केला. पण या किळसवाण्या लिखाणाचा उल्लेख वा प्रचार जनतेत सतत करणे मला योग्य वाटत नाही. हा एक प्रकारे कुसंस्कार ठरेल

वृत्तपत्रांतून लेनचे हे प्रलाप जनतेस समजले तेंव्हा जनता दु:खी झाली आणि संतप्तही झाली. प्रचंड प्रमाणात जनतेने वृत्तपत्रांनी याचा कडक निषेध केला. काही तरूण अतिशय संतापले आणि त्यांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला. अतिप्राचीन व दुर्मिळ अशा संस्कृत ग्रंथ संपदेचे खूप नुकसान झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्‍लोक जिजाबाई साहेब यांना आपल्या हद्यात देवतातुल्य पुजिणार्‍या युवकांना भयंकर संताप आला आणि लेन ज्या संस्थेत येत होते, त्याच संस्थेवर या युवकांचा राग उफाळला ही एक प्रकारे अस्वस्थ मानवी तरुण मनाची स्वाभाविक प्रतिक्रीया नव्हती काय ? पण या युवकांचा राग दुर्मिळ आणि राष्ट्रीय मोलाच्या ज्ञानधनावरच कोसळला. त्यांच्या मनातील संतापाचे तेल वडयावरुन वांग्यावर पडले. आता हे झालेले नुकसान म्हणजे आपलेच नुकसान. महाराष्ट्रातील आणि जगातीलही अगणित ज्ञान प्रेमी लोकांनी व वृत्तपत्रांनी आपले व्याकूळ दु:ख व्यक्त केले. मीही या ज्ञानहानीने व्यथित झालो. की मुले एवढी का संतापली हेही मला जाणवले.

या दु:खातही माझ्या मनात एक विचार फुंकर घालून गेला. आमच्या तरूणांच्या अंत:करणात छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुण्यशाली
‘कादंबिनीव जगजीवनदानहेतू: ’ असलेल्या महान योगीनी बद्दल, म्हणजे मराठी अंत:करणात तेवत असलेल्या अस्मितेबद्दल असलेलीही नितांत प्रेमादरपूर्ण श्रध्दा, भक्ती आणि जागतेपण पाहून माझे मन सुखावले. कारण त्या तरूणांचे मन मला समजले. त्यांच्या अंत:करणात असलेल्या या अस्मिताभक्तिशी मी एकणे एक टक्के सहमत झालो होतोही . मुले चुकतात.
त्यांच्यावर थोडे रागवावेही. पण हीच मुले त्यांच्या भावना लक्षात घेतलं तर, पुढे मौल्यवान अशी देव, देश आणि धर्म यांची नितांत भक्ती करण्यासाठी पुढे येतील. आजही महाराष्ट्रात अशी अनेक लहान मोठी जनसेवेची व
राष्ट्रसेवेची उपयुक्त कार्ये अशीच तरुण मुले करताना मी आणि आपण सर्वचजण महाराष्ट्रात पाहात आहोतच ना ! माझ्यापाशी एक साक्षात उदाहरण मी नित्य अनुभवतो आहे. महाराजा शिव छत्रपती प्रतिष्ठान
ट्रस्टच्या अनेक लोकोपयोगी व लोक जागृतीच्या कार्यात शेकडो तरुण तरणी, ग्रामीण आणि नागरी भागात काम करीत आहेत. शैक्षणिक, आरोग्य विषयक, अपंगांना मदत करणारे आणि शिव अस्मितांचे दर्शन व प्रदर्शन घडविणारे कार्य ही तरुण मुले करीत आहेत. त्यात सामाजिक व आर्थिक सर्व तर्‍हेच्या स्तरांवरील जीवन जगणारी ही मुले आहेत. ती स्वत:ची ही जास्तीत जास्त प्रगती करुन घेण्याचा प्रयत्न करीत असतात. जाणता राजा या सामूहिक शिवनाटय प्रयोगांच्या द्बारे याच मुलांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक लोकहितकारी संस्थांना कमीतकमी तीस कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. ऐतिहासिक स्थळी जाऊन शक्यतो तेथे चांगली आस्था व व्यवस्था निर्माण करण्याचे कार्य ही मुले करीत असतात. एवढे सांगितले तरी युवाशक्तीची आणि युवा अंत:करणाची मनोप्रेरणा आपणास जाणवेल.

व्हायला नको होते. पण झाले. आता उपाय नाही. पण आमच्या तरुणांना शिवाजी महाराजांचा आणि पुण्यश्‍लोक जिजाऊसाहेबांचा अपमान झालेला पाहून एवढी चीड, एवढा संताप येतोय हेही सुचिन्हच आहे. यातच आपला भविष्यकाल तेजोमय आणि उज्वल आहे याची चाहूल येते.

सदभावनेच्या भरात या तरुणांच्या हातून झालेल्या चुकांकडे आपण सर्वांनीच जरा पालकाच्या मायाममतेने पाहिले पाहिजे. या मुलांचे भावी जीवनात नुकसान होऊ नये. अशीच आपली इच्छा व प्रतिक्रीया ममतेने असायला हवी. छत्रपति शिवाजी महाराजांचे सुपुत्र व हिंदवी स्वराज्याचे तरुण युवराज संभाजीराजे यांच्याही हातून इ.स.१६७९ मध्ये काही चुका झाल्या
छ. शिवाजी महाराजांनी त्यांच्या चुकांवर त्यांना चार विवेकाच्या गोष्टी सांगून जवळ केलेच ना? याचा परिणाम म्हणजेच, पुढच्या इतिहासात याच युवराज संभाजीराजांच्या हातून घडलेला दिव्य इतिहास आपण पाहिलाच ना? असामान्य शौर्य, नेत्रदिपक धाडस, प्रतिभाशाली संस्कृत वाङमयाची निर्मिती, स्वराज्य रक्षणार्थ केलेली ‘थोरली मसलत’ आणि अखेर सद्धर्म, हिंदवी स्वराज्य, सार्वभौम छत्रपतीपदाची तेजस्वी अस्मिता आणि शेवटपर्यंत औरंगजेबापुढे अजिंक्य राहून अखेर धिरोदात्तपणे भयानक मृत्यूला सामोरा जाणारा या युवक छत्रपती त्यातूनच आपल्याला लाभला ना ? आमचा तो आदर्श ठरला ना ? आपल्यालाही असे कर्तबगार तरुण उद्या लाभतील अशी मला खात्री वाटते. विचारवंतांनी आणि महाराष्ट्र राज्याच्या सुशिल शासनाने याचा पालकाच्या मायेने, आत्मियतेने व क्षमाशील अंत:करणाने माझ्या या विचारांचा विचार करावा हीच अपेक्षा. माझे विचार मनापासून आणि श्रीसाक्ष प्रामाणिकपणाने मी आपणापुढे मांडले आहेत.

श्री.जेम्स लेन यांची माझी गाठ भेट, परिचय कधीच झाला नाही. झाला असता तर बरे झाले असते. वाईट झालेते टळले असते. तर ते मला भेटले असते, आणि जर त्यांनी माझी अभ्यासासाठी मदत वा मार्गदर्शन मागितले असते , तर त्याचा वेगळाच व चांगलाच परिणाम झाला असता. शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्या चारित्र्यांपुढे हे लेन नक्कीच लीन झाले असते. त्यांनी आपल्या ग्रंथाला, ‘शिवाजी : हिंदू किंग इन् मुस्लीम इंडिया’ हे चुकीचे नाव दिले आहे. त्याऐवजी त्यांनी कदाचित
‘महाराजा शिवछत्रपति : द सुप्रीम हिंदू नरसिंह राजा इन द वर्ल्ड ’ असेही नाव दिले असते ! पण अखेर लेनसाहेब नेहमीच्याच पाश्‍चात्य ‘बायस’ वळणावर गेले

बहुत काय लिहणे आमचे अगत्य असो द्यावे ही विज्ञापना.

-बाबासाहेब पुरंदरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा